Skip to main content

मध्ययुगीन जातीव्यवस्था - एक दृष्टिक्षेप

गतकालीन इतिहासाचे अवलोकन करीत असताना, काळाच्या मर्यादा जाणणे फार आवश्यक असते. वास्तविक इतिहासातील कोणत्याही घटनेचे जसेच्या तसे संपूर्ण आकलन करून घेणे अशक्य आहे. आपण केवळ उपलब्ध संदर्भ-पुराव्यांच्या आधारे जास्तीत जास्त सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो. कर्मकांड, अंधश्रद्धा, पोथीनिष्ठ धार्मिक समजूती यांचे मध्ययुगात वर्चस्व होते, हे खरेच ! केंद्रीय राजसत्ता पेशव्यांच्या मुठीत आल्यावर राजकीय व्यवस्थेत ब्राह्मणांचे वर्चस्व वाढले. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूपश्चात या व्यवस्थेत जी अनागोंदी माजली तिची वर्णने क्लेशदायकंच आहेत. समाज म्हटला, म्हणजे असे दोष प्रत्येक समाजात, प्रत्येक काळात आढळतील; पण कुठल्याही बाबतीत असे थेट काळे-पांढरे पट्टे ओढता येत नाहीत; हेच दाखवण्यासाठी हा प्रयत्न.

मध्ययुगात वर्णभेद व त्या त्या वर्णांची कर्तव्ये याविषयीची समजुत दृढ होती. या कर्तव्यांचे पालन म्हणजेच धर्मपालन असे समजले जात असे. याबद्दल एक उदाहरण देतो. छत्रपती संभाजी महाराज आपल्या 'बुधभुषणम्'या ग्रंथात शिवछत्रपतींचा गौरव करताना म्हणतात -
येन क्षोणितले कलावविकले बुद्धावतारं गते
गोपलेखिलवर्णधर्मनिचये म्लेच्छैः समासादिते ।
भूयस्तपरिपालनाय सकलाञ्जित्वा सुरद्वेषिणः
स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादीवर्णाः कमात ।। (१-१०)

अर्थ - या  धरतीवर कलियुग पूर्णपणे अवतरले होते. बुद्धावताराची, कृष्णावतराची समाप्ती झाली होती. सर्वत्र म्लेंच्छांनी काहूर माजविले होते. त्यावेळी सर्व देवाधर्मांचा द्वेष करणाऱ्या लोकशत्रुंंना जिंकून पुनः पृथ्वीचे रक्षण करण्याच्या हेतून त्यांनी(शिवछत्रपतींनी) विप्र(ब्राह्मण) इ. सर्व लोकांना आपल्या वर्णानुसार कर्तव्यपुर्तीच्या मार्गी लावले.

यासोबतंच आणखी एका उदाहरणाचा उल्लेख करतो. छत्रपती संभाजी महाराज राजा रामसिंगाला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "श्रुतिस्मृति-प्रतिपादित वर्णाश्रम धर्म आणि प्रजापालनाचा राजधर्म यांना पोहोचणारी हानी आपल्याला सहन होत नाही." (ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा पृ. क्र. १८७). येथे जन्माधारित वर्णव्यवस्थेचे समर्थन करणे हा हेतू नसून, मध्ययुगात सर्वंच हिंदू राज्यकर्त्यांची धारणा 'प्रत्येक व्यक्तीने आपापल्याला वर्णानुसार करावयाचे कर्तव्यपालन म्हणजेच धर्म' अशीच होती हे दाखवणे हा हेतू आहे.

अमक्या वर्गाला समाजात अतिशय खालचे स्थान दिले जात होते, कोणतेही अधिकार दिले नव्हते; असे अनेकदा म्हटले जाते. या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे जाणून घेण्यासाठी मध्ययुगीन ग्रामव्यवस्था जाणून घेऊ. मध्ययुगीन महाराष्ट्रात गावाच्या कारभारात, विशेषतः कर गोळा करणे व राखणदारी करणे यामध्ये पाटील, कारभारी, चौगुला आणि महार असा चार प्रकारच्या व्यक्तींचा सहभाग असे. यापैकी कर गोळा करण्याचे काम पाटील करत असे. करांचा हिशोब ठेवण्याचे आणि इतर लिखापढीचे काम कुलकर्णी करत असे. चौगुला कर गोळा करण्याच्या कामात पाटलाला मदत करत असे आणि महार हा गावचा शिपाई आणि गावच्या सीमांचा राखणदार म्हणून काम करत असे.

तरी महार व्यक्तींनाही पाटीलकीची वतने दिल्याची उदाहरणे खालील पत्रांमध्ये सापडतील -
१. सनदापत्रांतील माहिती, पृ. क्र. १८३-८४ (या पत्रात विशेषतः पुर्वी लुबाडलेली पाटीलकी महार व्यक्तीला न्याय करून परत दिली आहे.)
२. पेशवेकालीन आर्थिक व सामाजिक पत्रव्यवहार ले. १३,१४.

मध्ययुगात महार-मांग, महार-चांभार अशा भांडणांचेही निवाडे केल्याची उदाहरणे या काळात सापडतात. कुठल्याही एका जातीचा किंवा बलुत्याचा व्यवसाय दुसऱ्या जातीने करू नये, अशी ज्याची त्याची ठाम समजूत होती. तशी पत्रे पुरंदरे दप्तर, ओतुरकरांचे आर्थिक व सामाजिक व्यवहार यात पहावयास मिळतात ! इतकेच का, तर न्यायनिवाडे करण्यासाठी ज्या गोतसभा बसवल्या जात त्यातंही ब्राह्मण, प्रभू, मराठा, महार, चांभार, मुसलमान बसल्याची उदाहरणे आहेत. (श्री राजा शिवछत्रपती भाग १ - गजानन मेहेंदळे पृ. क्र. ३१४,३२६,३२७. याशिवाय पहा छत्रपती शाहू रोजनिशी, ले. २९६-२९७.)

वतने ही सरसकट महार व्यक्तींचे हवाली केली जात नसून, प्राधान्य मात्र मराठा व्यक्तीला दिले जायचे, असे एका पत्रावरून वाटते.(उदा. पेशवेकालीन आर्थिक व सामाजिक पत्रव्यवहार - ले. ४७). परंतू 'इंग्रजांचे राज्य येईपर्यंत तत्कालीन समाजव्यवस्थेत अमक्या जातीस काही स्थानंच नव्हते', असा जो अपप्रचार केला जातो, त्यासही काही अर्थ उरत नाही.

मध्ययुगात बेदरच्या बादशाहीपासून महार व्यक्तींना बावन्न हक्कांची सनद दिली होती. गावातील प्रत्येक लग्न, मयत यामागे महारांना कर दिला जात असे. बाजारात येणाऱ्या मालावर जकात वसुलीचा हक्क महारांना असे. विशेष म्हणजे इ. स. १७३८च्या एका पत्रात महारांचे काही अधिकार व कर्तव्ये सांगून 'याखेरीज महार बावन हकाचे धणी म्हणून दुनिया बोलतात' असा उल्लेख सापडतो !
(पेशवेकालीन आर्थिक व सामाजिक पत्रव्यवहार - ले. ४६)

वाचन-लेखन इ. शिक्षण सर्वच जाती घेत नव्हत्या. आपापल्या व्यवसायानुसार शिक्षण घेण्याकडे सर्वांचा कल होता. तरी व्यवसायात गरज पडल्यानुसार व्यक्ती लिहायला वाचायला शिकत असत. मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर माऊंटस्टुअर्ट एलफिन्स्टन आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हणतो, "लिहिणे-वाचणे ब्राह्मण, व्यापारी, शेती करणारे वर्ग इत्यांदीपुरता मर्यादित आहे." (Report on territories conquered from Paishwa, 1821,page no. 56) . इतिहासाचार्य राजवाडे यांनी एका कुणबी व्यक्तीची सही असलेला कागद पुर्वी प्रकाशित केलेलाही दिसतो(समग्र राजवाडे साहित्य खंड १३, पृ. क्र. ३३८). म्हणजेच ब्राह्मणांव्यतिरीक्त इतर कोणत्याही जातीस अजिबात शिक्षण दिले जात नव्हते, हा दावाही निराधार ठरतो.


राज्यावर कर्ज झाले, पैशाची निकड भासली, म्हणजे काहीवेळेस जनतेवर जास्तीचा कर लादला जात असे, त्यास ‘कर्जपट्टी’ म्हणत. गरिबावर जास्तीचा कर लादला जाऊ नये अशी विनंती केली म्हणून, अशी कर्जपट्टी महार व्यक्तींकडून घेऊ नये, अशी सूचना नानासाहेब पेशव्यांनी केलेली आढळते(बाळाजी बाजीराव रोजनिशी भाग १ - गणेश चिमणाजी वाड, ले. ४९६). याशिवाय मौजे कळंबी प्रांत मिरज येथील एका गावावरती जप्ती आणली. पुढे चौकशी अंती तो गाव राजनाक वल्लद काळनाक महाराकडे पूर्वीपासून असून तो हुजुर चाकरी करतो, हे समजतच गावचा मोकासा व महसूल त्याकडे परत केला आणि गाव जप्तीतून मोकळे केले. (थोरले माधवराव पेशवे रोजनिशी भाग १, ले. ३४०).
पाली गावच्या भोयी महारास सरकारचा अधिकारी म्हणून कुलकर्णी, खोतपाटीलांसारखाच गावठाण माफ केल्याचे नानासाहेबाच्या रोजनिशीतील उल्लेखात कळते (बाळाजी बाजीराव रोजनिशी भाग १, ले. ३२६, पृ. २०३). पंढरपुरात राडिचा खेळ होत असे. ती जागा खणून तयार करायचा मान महारांचा असे. एका वर्षी बडवे तो खणू लागताच तंटा उभा राहीला आणि निकाल महारांच्या बाजूने देऊन बडव्यांना सख्त ताकीद केली(सवाई माधवराव रोजनिशी भाग ३, ले. ११४०,पृ. २८५).१७८९ मध्ये कात्रज गावानजिक महार, चांभार व मांग समाजाची वस्ती होती ती. काही कारणाने मोडावी लागली. लगोलग हुजुरातीतून २५१ रुपये आणि ३०० वासे नवीन घरे बांधण्यासाठी दिल्याचे स्पष्ट होते. (सवाई माधवराव रोजनिशी भाग ३, ले. ११४२,पृ.२८६). यावरून सरकारदरबारी न्याय मिळण्यास जातीची अडचण नव्हती, हे लक्षात येते.


एकीकडे स्पृश्यास्पृश्यतेच्या समाजधारणा दृढ होत्याच; पण त्या राखून रयतेची कशी सोय लावली जात असे, त्याचे उदाहरण म्हणून एकाच विषयाशी निगडीत दोन-तीन पत्रे दाखवता येतील. सदर पत्रे इ. स. १८२१च्या दरम्यानची आहेत. याकाळात खरेतर समाजातील शुद्रातिशुद्रांवर सर्वाधिक अन्याय झाला, असे सांगण्यात येते; पण या पत्रांतून हा दुसरा पैलूही नजरेस पडतो. सदर पत्रे ही दिवेघाटात पाणपोईची सोय करण्याबाबत आहेत. या पाणपोईजवळंच एक विठोबाची मुर्ती होती आणि जवळंच एका रामोशी व्यक्तीचा निवास होता. तेव्हा भ्रष्टाकार होऊ नये; म्हणून या रामोशी व्यक्तीस एकतर चौकी सोडून जावी, किंवा वीस हात लांब दुसरी चौकी करावी अशी ताकीद दिली. याच पाणपोईशी निगडीत दुसऱ्या एका पत्रात 'ब्राह्मण व शूद्र वगैरे वाटसरू येतील जातील त्यास पाणी पाजीत जावे' अशा सूचनेवरून ब्राह्मण व शुद्र दोघांसाठीही पाण्याची व्यवस्था एकाच पाणपोईवर केलेली होती, हे लक्षात येते. (पेशवेकालीन आर्थिक व सामाजिक पत्रव्यवहार - ले. २२, २४, २६).




रघुनाथ यादव या समकालीन व्यक्तीने इ. स. १७६१साली लिहीलेल्या आपल्या बखरीत नानासाहेब पेशव्यांचे अंतःसमयीचे उद्गार नोंदवले आहेत. "देशस्त कोकनस्त व प्रभु व सेणवई यांचा द्वेश अदेशा न धरावा. दौलत बहुताचा भाग आहे. सर्वांचे मनोरथ रक्षावे. मणुश राजी राखिल्याने दौलतीस अपाये नाही यैसे तीर्थस्वरुप अापा पासुन आह्मास आज्ञा जाली आहे व तुह्मी हेच चालवावे. आम्ही जातो म्हणून उदास न होणे. धंदे व दरख ज्याचे त्यास रक्षावे. न्याये नितीने परद्रव्ये परदारास या विशयी विचारे असावे. राज्य नितीस न्याये अन्याये पाहून सिक्षा करीत जावी. धर्म निती सोडू नये. गौब्राह्मण द्वीज प्रज्यासंरक्षण येथा न्याय करावे. अन्याये कर्म सहसा करु नये. हिंदू मराठे मुसलमान यांणी आपले आपले रितीने वर्तल्यास द्वेश सहसा कोन्हे ही जातीचा न करावा, व ज्याचा जो धर्म ज्याचे जे दैवत त्याज विशई द्वेश राज्ये नितीस नसावा"

वरील वृत्तात आणिक एक विशेष बाब म्हणजे हिंदुस्थानात राहणारे ते सारे हिंदू आणि महाराष्ट्रात राहणारे ते सारे मराठे या अर्थाने 'हिंदू, मराठा' हे शब्द आलेले दिसतात !



स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनीच एकदा म्हटले आहे, "...जर त्याने (मनुने) जातीव्यवस्था निर्माण केली, ही गोष्ट सत्य मानली, तर मनु हा एक साहसी मनुष्य मानला पाहिजे आणि मग ज्या समाजाने त्याचा स्विकार केला तो समाज आज आपण ज्या समाजात राहतो त्यापेक्षा वेगळा असलाच पाहिजे... ...जातीव्यवस्थेचा कायदा निर्माण केला गेला (जातीचा कायदा दिला) ही गोष्टच अकल्पनीय आहे. असं म्हणणं अतिशयोक्तीपूर्ण होणार नाही, की नुसत्या चार शब्दांच्या बळावर स्वत: मनुही अशा कायद्याचं पालन करु शकणार नाही, जिथे एक वर्ण रसातळाला जाईल आणि दुसरा वर्ण प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचेल... ...जातीव्यवस्थेचा प्रसार आणि वृद्धी करणं हे इतकं विशाल आव्हान आहे, की ते कोणत्याही एकाच जातीच्या लोकांच्या शक्ती आणि युक्तीने साध्य केलं जाऊ शकत नाही. ब्राह्मणांनी जातीव्यवस्था निर्माण केली अशा सिद्धांतांच्या दाव्यासही हेच लागू होतं. असा विचार करणं (की ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या) हे चुकीचं आहे आणि (यामागचा) हेतू द्वेषपुर्ण आहे हे मला लक्षात आणून द्यायचंय, याव्यतिरिक्त जे मी मनुबद्दल बोललो तेच इथे लागू होतं (त्यापेक्षा अधिक बोलण्याची गरज नाही)." [Dr. Babasaheb Ambedkar writings and speeches vol. 1 (castes in India) page no. 16]

थोडक्यात काय तर तत्कालीन समाजरचना व समाजधारणा आजच्यापेक्षा निश्चितंच वेगळी होती आणि जातीव्यवस्थेतील दोषांचे खापर कोणा एकाच वर्गावर फोडता येणार नाही, हे स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटले आहे. मध्ययुगीन भारतात जातीभेद वा अस्पृश्यता नव्हतीच; असे मी म्हणण्याचा प्रश्नंच येत नाही. कोणाच्या दोषांवर पांघरुण घालण्याचाही प्रश्न नाही; पण अलीकडे जे हेत्वारोप केले जातात, जी अतिरंजित परिस्थिती वर्णन करून सांगितली जाते; त्यात तरी तथ्य आहे का ? माझ्यामते काळाच्या मर्यादा ओळखून याकडे पहावयास हवे. जातीविषयक ही बंधने, कर्तव्ये व मर्यादा हाच खरा धर्म अशी एकजात समाजाची तेव्हा समजूत होती; पण त्याचबरोबर या मर्यादा राखूनही विविध जातीधर्मांबाबत राज्यकर्ते म्हणून सर्वच मराठा राज्यकर्त्यांचे धोरण सहिष्णू होते असे निष्कर्ष आतापर्यंत विचारांत घेतलेली उदाहरणे पाहता काढता येतील. तेव्हा कोणीही कोणाविरुद्ध केलेला विद्वेषी प्रचार सत्य मानण्यापूर्वी एकवार स्वतः इतिहासाची पाने चाळावीत एवढेच मी म्हणेन ! आदरणीय बाबासाहेब पुरंदरे म्हणतात त्याप्रमाणे, "इतिहासात चंदनंही आहे आणि कोळसाही आहे, आपण काय उगाळायचे हे ज्याचे त्याने ठरवावे !"


©डॉ.सागर पाध्ये

संदर्भग्रंथाची यादी -
१. श्री राजा शिवछत्रपती भाग १ - ग. भा. मेहेंदळे.
२. बुधभुषणम् - छत्रपती संभाजी महाराज (संपादक -एच. डी. वेलणकर).
३. पेशवेकालीन आर्थिक व सामाजिक पत्रव्यवहार - रा. वि. ओतुरकर.
४. बाळाजी बाजीराव रोजनिशी भाग १ - गणेश चिमणाजी वाड.
५. माधवराव पेशवे रोजनिशी भाग १ - गणेश चिमणाजी वाड.
६. सवाई माधवराव पेशवे रोजनिशी भाग ३ - गणेश चिमणाजी वाड
७. रघुनाथ यादव चित्रगुप्त विरचित बखर पानिपतची - उदय कुलकर्णी, निनाद बेडेकर.
८. ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा - सदाशिव शिवदे.
९. सनदापत्रांतील माहिती - पुरुषोत्तम विश्राम मावजी, द. ब. पारसनीस.
10. Dr Babasaheb Ambedkar writings and speeches Vol. 1.

याशिवाय अधिक माहितीसाठी पुढील लेखंही पाहता येईल -
http://sahajsuchalamhanun.blogspot.com/2016/06/blog-post.html?m=1

Comments

  1. खुप छान व ससंदर्भ लेख

    ReplyDelete
  2. सागर जी छान माहिती दिलीत.

    ReplyDelete
  3. उत्तम माहिती अगदी सुरेख शब्दात सांगितली. खरंच इतिहासाचा अभ्यास हा खऱ्या मुळापासूनच करायला हवा.

    ReplyDelete
  4. सुंदर व सप्रमाण माहिती....

    ReplyDelete
  5. या लेखास देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार !

    ReplyDelete
  6. खूप खूप धन्यवाद!
    चित्रपट पाहून आल्यानंतर अनेक शंका दाटून आल्या होत्या..अक्षरशः पटले की इतिहास खरेच जाणून घ्यायचा असेल तर अगदी वाचताना शंका घ्यायलाच हवी...मात्र त्यामुळे प्रत्येक गोष्ट शंकाच बनून राहू नये...आपण दिलेल्या संदर्भ साहित्याची ओळख आज च्या पिढीला होणं फार गरजेचे आहे...
    चित्रपट,नाटक ही साधने इतिहास जिवंत ठेवण्याची आधुनिक आणि प्रभावी साधने आहेत हे ही तितकंच खरं!
    फक्त सत्यासत्यता पडताळून पाहणे,वास्तवाच्या अंगाने विचार करणे अधिक महत्त्वाचे..

    ReplyDelete
  7. उत्कृषटरित्या लिहिलं आहे डॉक्टर.
    पण एक गोष्ट लक्षात आणून द्यावीशी वाटते ती ही की the beautiful tree hya ग्रंथामध्ये धर्मपाल ह्या गांधीवादी विद्वानाने ब्रिटीश सरकारची नेटिव्ह शिक्षणा बद्दलची कागदपत्र उधृत केली आहेत.
    ह्या कागदपत्रांमध्ये भारतातील शिक्षणाची वास्तविक परिस्थिती काय आहे हे जाणण्याचा प्रयास ब्रिटिशांनी १८००-१८३० च्या दरम्यान केला.
    आणि त्याच कागदपत्रांच्या आधारे असा स्पष्ट निष्कर्ष निघतो की प्रत्येक वर्ण,अगदी पंचम वर्णाचे चांडाळ इत्यादी सुद्धा गावातील शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असत.
    शाळांची संख्या,त्यात शिकवले जाणारे विषय,विद्यार्थ्यांची जातीनिहाय संख्या इत्यादी सर्व माहिती त्यात प्राथमिक कागदपत्रांच्या आधारे आहे.

    तुम्हाला प्राथमिक स्वरूपाची माहिती हवी असल्यास मी ही लिंक शेयर करतोय -
    https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.esamskriti.com/e/History/Indian-History/Indigeneous-Education-in-the-18th-century-1.aspx&ved=2ahUKEwjJsqCn5bvqAhXRfH0KHYoxDxoQFjABegQIBRAB&usg=AOvVaw317cR0p_y6nHtxOaBNNxWU

    ReplyDelete
    Replies
    1. या माहितीसाठी मन:पूर्वक धन्यवाद !

      Delete
  8. अप्रतिम माहिती दादा 👍

    ReplyDelete
  9. अगदी माहिती पूर्ण व अभ्यास युक्त लेख 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्या

विजयुदुर्गावरील पराजय : मराठा राजकारणाची शोकांतिका

रा. रा. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी आपल्या लिखाणातून मराठेशाहीच्या विविध अंगावर अनेकदा टिका केली आहे. गो. स. सरदेसाईलिखित 'नानासाहेब पेशवे' चरित्राची प्रस्तावना शेजवलकरांनी लिहिली आहे. आपल्या धारदार लेखणीने शेजवलकरांनी पेशव्यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत, पण काही शब्दांत मराठेशाहीचे दुर्गुण विषद करताना ते म्हणतात, "...प्रत्येक सरदार मुलुखगिरीवर निघण्याच्या आधीच जिंकावयाच्या मुलुखाची सनद छत्रपतींकडून करून घेई. छत्रपतींच्या दरबारचे प्रधान हे निदान इतका तरी मान ठेवतात, असेच समजत. शाहूच्या आगमनाने या प्रकारांत वाढच झाली. पेशव्यांनी जुन्या शिरजोर सरदारांस मोडण्याचा प्रयत्न केला, पण असे करण्यासाठी त्यांस नवीन स्वतःचे सरदार निर्माण करावे लागले. तात्पर्य काय, एकसुत्रीपणास बाध यावयाचा तो आलाच. नानासाहेबास जयाप्पा शिदेंसारख्या सरदारांस जे चुचकारावे लागे व मल्हाररावाच्या मनस्वीपणापुढे मान वाकविण्याची पाळी येई, ते यामुळेच ! मात्र असे पेशवे न करते तर मराठ्यांचे जे नाव गाजले तेहि गाजले नसतें..." (प्रस्तावना - पृ. क्र. १४) १२ फेब्रुवारी १७५६ रोजी नानासाहेब पेशवे व इंग्रज